नवी दिल्ली : ‘देशातील विविध भागांमध्ये अतिजलद रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी आणखी तीस नव्या वेगवान रेल्वेगाड्यांचे काम सुरू झाले असून, आणखी १०० अशा रेल्वे बनवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) पत्रकारांना दिली.
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या पहिल्या अतिजलद रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यानंतर गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गोयल म्हणाले, ‘ आपल्या देशात अशा आणखी ३० रेल्वे बनविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे सज्ज झाली आहे. नवीन रेल्वेंमुळे तिकीट दरात कपात करणेही शक्य होईल. त्यामुळे लोकांना रेल्वेने कमी पैशात जलद प्रवास करता येईल.’
‘पहिली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू करण्यात आली असून, ती ७७५ किलोमीटरचे अंतर केवळ आठ तासात पार करणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही रेल्वे या मार्गावर सेवा देणार आहे. यामध्ये कानपूर आणि अलाहाबाद असे दोन थांबे असतील. कमाल १६० किलोमीटर प्रती तास या वेगाने ती धावू शकते मात्र ती बहुतांश अंतर १३० किलोमीटर वेगाने पार करेल. या रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस आदी सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. यातील आसने १८० अंशाच्या कोनात वळणारी असून, अत्यंत आरामदायी आहेत. ही रेल्वेगाडी निर्माण करण्यासाठी ९७ कोटी रुपये खर्च आला आहे,’ असेही गोयल यांनी सांगितले.
‘संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी तयार करण्यासाठी केवळ १८ महिने लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ मेक इन इंडिया’ मोहिमेचे हे यश आहे. या रेल्वेचे डिझाइन भारतीय अभियंत्यांनी केले आहे. हे अत्यंत अभिमानास्पद आहे,’ असेही गोयल यांनी नमूद केले.